Thursday, April 25, 2019

भेट नागझि-याशी

खूप दिवस मनाला कुणीसं भुलवत होतं, बोलावत होतं, खुणावत होतं, आणि एक दिवस मी जंगलात गेले तेव्हा कळलं की ते बोलावणारं दुसरं तिसरं कोणी नसून जितंजागतं जंगल होतं. स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं की ख-याखु-या जंगलात जाता येतं, चार दिवस जंगलमय होऊन रहाता येतं, मीही राहीन, जंगल पाहीन, जंगल फिरीन, जंगल वाचीन, जंगलाचे रंग, रूप, रस,गंध, स्पर्श शोषून घेऊ पाहीन माझ्यात; त्याच्या माती आणि पाण्यासह, प्रकाश आणि आकाशासह, झाडं, वेली, दगड, धोंडे, पशु आणि पक्षी आणि सा-यासह जंगल जगू पाहीन मी असं कधी वाटलं नव्हतं.. बालपणी सगळ्या कथाकवितांमधून मनात ठसला होता एक बागुलबुवा 'जंगल' नावाचा, म्हणून मी डोळे विस्फारून, कान टवकारून, श्वास रोखून जंगल अजमावत गेले, जंगलाला ध्यानी मनी स्वप्नी गोंदून घेत गेले आणि कळलं, बागुलबुवा तर नाहीच तो पण, 'जंगल धरतीचा एक स्वयंजात श्वास आहे, जंगल एक काव्य आहे, जंगल एक बोलावणं आहे- निखळ जगण्याचं आमंत्रण; जंगल हे एक सत्चिदानंदी  जगणं आहे'.

No comments:

Post a Comment